
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “पर्यावरण आणि माझी जबाबदारी” या विषयावर डॉ. शिवाजी कागणीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅलेजचे प्राचार्य अरविंद पाटील होते, व्यासपीठावर मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक श्री शिवाजीराव पाटील, ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री राहूल जाधव व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनींच्या सुमधूर वसुंधरा गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला शिक्षण महर्षी नाथाजीराव हलगेकर व भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या व विद्यार्थिंनींच्या हस्ते झाले.

समाज परिवर्तन व पर्यावरण रक्षणाचा वसा घेऊन पर्यावरण दूत म्हणून वावरणारे डॉ. शिवाजी कागणीकर म्हणाले, सागरी प्रदूषण, वाढती लोकसंख्या नियंत्रण , ग्लोबल वार्मिंग, वन्यजीव रक्षण आणि संवर्धन ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाच्या प्रगतीचा डंका आपण वाजवतो आहे, विज्ञानाच्या प्रगती बरोबर माणसांची हवरट लालसा जन्माला आली, आणि याच लालसेपोटी रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा अंदाधुंद वापर होतो आहे. त्यामुळे चंद्रावर पोहचलेल्या माणसाचा पाया डळमळीत झाला आहे. आज विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी छोटे एक पाऊल उचलून मोठा बदल घडवून आणला पाहिजे, प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे, एक तरी झाड लावलं पाहिजे आणि पाणीही वाचवलं पाहिजे. भविष्यातील आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. निसर्गाचा पर्यावरणाशी, पर्यावरणाचा निसर्गाशी आणि निसर्गाचा आपल्या जीवनाशी घनिष्ट संबध आहे.
खरंतर सुर्य उगवतो ही दिनाची सुरूवात असते आणि झाड उगवते ती सुदिनाची नांदी असते. वनिकरणाचा सेतू बांधण्यासाठी शासन आणि सामाजिक संघटना आता चांगली पावलं उचलताना दिसत आहेत याच सेतू बांधनित माझा ही एक दगड (एक झाड) असला पाहिजे अशी प्रत्येक विद्यार्थ्याची ओढ असली पाहिजे.
कार्यक्रमाचा समारोप करताना प्राचार्य अरविंद पाटील यांनी “वसुंधरेच्या शालूला हिरवा रंग लावूया आणि बहरलेल्या सृष्टीच्या अंतरंगात मनसोक्त न्हाऊया!” या काव्य पंक्तीतील ओळीवर भर देताना, मराठा मंडळाच्या कल्पक अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांनी नुकताच मार्गदर्शित केलेल्या “ई वेस्ट” अर्थात “ई कचरा” संकलनाचा आढाव घेत विद्यार्थिनींनी पर्यावरण प्रदूषण करायची कृती करायची नाही किंबहुना कुणाला करू ही द्यायचं नाही, याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने घ्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. काॅलेजच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी आर जाधव यांनी केले व पाहुण्यांची ओळख प्रा.आरती नाईक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सोनल पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मंगल देसाई, प्रा. सुनिता कणबरकर, प्रा एन ए पाटील, प्रा. आर व्ही मरित्तमण्णावर,प्रा दिपाली निडगलकर, प्रा पी व्ही कर्लेकर, प्रा. सरीता देसाई व प्रा. नितीन देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.
