अयोध्या/खानापूर:
“भक्तीच्या नगरीत शक्तीचा जागर” काय असतो, याचा प्रत्यय नुकताच अयोध्या येथे आला. प्रभू श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी गेलेल्या खानापूरच्या भाविकांना तिथे अनपेक्षितपणे आपल्याच तालुक्यातील तीन लेकी लष्करी गणवेशात (CRPF) सुरक्षेची धुरा सांभाळताना दिसल्या. हा क्षण केवळ त्या भाविकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी अभिमानाचा ठरला आहे.
उत्तर भारत यात्रेत घडले ‘लेकींचे’ दर्शन
खानापूर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि करंबळ ग्रामपंचायत चे माजी अध्यक्ष श्री. देवानंद घाडी यांनी आपल्या प्रतिवर्षाच्या परंपरेप्रमाणे यंदाही उत्तर भारत यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेदरम्यान जेव्हा ते अयोध्या येथे श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन मराठी तरुणी आढळल्या. चौकशीअंती त्या आपल्याच खानापूर तालुक्यातील यडोगा आणि गंगवाळी, खैरवाड येथील असल्याचे समजताच सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला.

यडोगा येथील मयुरी मल्लाप्पा अंधारे, खैरवाड येथील अश्विनी निंगाप्पा पाटील व गंगवाळी येथील पूजा अशोक पाटील या लेकींची ‘सेक्युरीटी’ सेवा या तीनही युवती CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) मध्ये भरती झाल्या असून, सध्या त्यांची नियुक्ती जगाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर सुरक्षा पथकात आहे.
यडोगा आणि गंगवाळी सारख्या ग्रामीण भागातून जिद्दीने लष्करात भरती होऊन, या मुली आज देशाच्या अतिसंवेदनशील आणि पवित्र स्थळाचे रक्षण करत आहेत.
लाखो भाविकांची गर्दी सांभाळणे, त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि शिस्त राखणे ही कठीण जबाबदारी या ‘सैनिक मुली’ अत्यंत समर्थपणे पार पाडत आहेत.
कर्तव्यदक्षता आणि माणुसकीचा सन्मान
देवानंद घाडी यांनी या ठिकाणी या तिन्ही रणरागिणींची भेट घेतली. यात्रेकरूंची सेवा करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा नसून कर्तव्याचा आनंद होता. आपल्याच गावच्या लेकींना लष्करी वर्दीत बघून घाडी यांनी त्यांचे कौतुक केले. “आपल्या भागातील मुली आज अयोध्येसारख्या ऐतिहासिक ठिकाणी देशाची सुरक्षा करत आहेत, हे पाहून ऊर अभिमानाने भरून येतो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गावाकडच्या ‘सैनिकी मुली’ म्हणून गौरव केला.
या बातमीने यडोगा आणि गंगवाळी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. केवळ घरातील चूल आणि मूल न सांभाळता, या मुलींनी हातात शस्त्र घेऊन देशसेवेचे व्रत स्वीकारले आहे. अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी त्या ‘सुरक्षा रक्षक’ असल्या, तरी खानापूरच्या जनतेसाठी त्या ‘स्वाभिमानाचे प्रतीक’ आहेत.
या तीन मुलींचे कार्य हे सिद्ध करते की, खानापूरची माती केवळ निसर्गानेच समृद्ध नाही, तर तिथे देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली पिढी घडत आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिरात या लेकींनी केलेली सेवा हीच खरी ‘देशभक्ती’ आहे.

खानापुरात अँटीला जनरिक मेडिकल… औषधावर 90% सूट.. व्हिडिओ पहा..