वैदिक मंत्रोच्चार, अग्निहोत्र व सनातन विचारांनी भारलेला खानापूरातील धार्मिक सोहळा.
खानापूर :
श्रीदत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित प.पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजाच्या दिव्य सान्निध्यात यजमान श्री निवृत्ती कल्लाप्पा पाटील व सौ साक्षी निवृत्ती पाटील(मारुती नगर ) यांच्या ‘दत्त भिक्षा’ या नूतन वास्तूचा गृहप्रवेश व वास्तुशांती सोहळा अत्यंत भक्तिभाव, शिस्तबद्ध वैदिक परंपरा आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला.
वैदिक मंत्रोच्चार, होमहवन व अग्निहोत्र यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा, शांती व मंगलतेचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी सद्गुरु चरणी श्रद्धा व्यक्त करत सनातन संस्कृतीचा अनुभव घेतला.
या सोहळ्यास खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलजी हलगेकर, माजी आमदार श्री. अरविंदजी पाटील, बेळगाव भाजपा उपाध्यक्ष श्री. प्रमोदजी कोचेरी, खानापूर तालूका माजी भाजपा अध्यक्ष श्री संजय कुबल, लैला शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सदानंद पाटील, खानापूर तालुका सचिव श्री गुंडू तोपिनकट्टी, राजू करंबळकर, सोमनाथ पाटील कर्नाटक कार्याध्यक्ष,यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. खानापूर विभागासह आसपासच्या भागातील परमपूज्य स्वामीजींचे हजारो शिष्य, भक्तगण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्गुरु दर्शन व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
या वेळी निरूपणात स्वामीजी म्हणाले, *“आपण सर्वजण सनातन तेजाचे उपासक आहोत. अग्नी हे तेजाचे मूर्त स्वरूप असून तो केवळ यज्ञापुरताच नव्हे, तर घरातील जीवनशक्तीचा आधार आहे. घरातील अग्नी घराचे पोषण करतो, शुद्धीकरण करतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो. म्हणून प्रत्येकाने तेजाची, सत्याची आणि धर्माची उपासना केली पाहिजे.”
स्वामीजींच्या या विचारांनी उपस्थित भाविकांमध्ये अध्यात्मिक जागृती निर्माण झाली. धार्मिक परंपरा, वैदिक शिस्त आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुंदर समन्वय साधणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
