खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यातील जांबोटी मार्गे गोव्याला जाणारा प्रवास म्हणजे एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे. चोरला भागातून असो किंवा अनमोड भागातून असो गोव्याला जाणारा रस्ता म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी म्हणण्याची वेळ आली आहे. एकंदरीत गोव्याला जोडणाऱ्या या दोन्ही रस्त्याची परिस्थिती दयनीय होत आहे.
एकीकडे अनमोड मार्गावरील महामार्ग खचल्याने अवजड वाहनांची मोठी गोची झाली आहे. त्यात कुसमळी नजीकचा पुल नव्याने झाल्याने अवजड वाहतूक थबकली आहे. पर्यायी खानापूर हुन जांबोटी मार्गाचा अवलंब अवजड वाहतूकदार करत आहेत. पण या ठिकाणी अवजड वाहतूक वाहणाऱ्यांना दुसऱ्या गाडीला रस्ता देताना मात्र कसरत करावी लागत आहे. मंगळवारी सकाळी जांबोटीच्या दिशेने जाणारा एक अवजड वाहतूक दुसऱ्या एका ट्रकला रस्ता देताना रस्त्याच्या बाजूला पूर्णतः रुतला आणि या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. सकाळी शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेला येणे जाणे कठीण झाले. बस वाहतूक थांबली. त्यामुळे आजच्या शाळेला काही विद्यार्थ्यांना दांडी द्यावी लागली तर काही ना काही चालत येऊन शाळा गाटावे लागले.
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागामधील मुख्य रस्ता आलेल्या चोरला मार्गाला नेमका वाली कोण? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या या दोन राज्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे सौजन्य वेळीच झाले नाही दुरुस्ती किंवा पूल बांधणीचे काम हाती घेण्यात आले मात्र ते वेळीच पूर्ण झाले नाही त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याची ऐशी की तैशी झाली आहे.
कुसमळी नजीकचा पूल बांधून पूर्ण झाला. मात्र या पुलावरून अवजड वाहतूक आजही करणे अवघड झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारे पूर्णतः वाहतूक पर्यायी मार्गाचा अवलंब करून एक तर अनमोड मार्गे महामार्गावरून जाणे सक्तीचे करण्यात आले. पण अनमोड महामार्गावर एक ठिकाणी एका बाजूने रस्ता खचल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आणि तेथेही अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यात आला. अनेक अवजड वाहतुक किंवा ट्रक चालक सध्या खानापूर होऊन जांबोटी मार्गे चोरला मार्गाचा अवलंब करत असले तरी हा राज्यमार्ग सिंगल असल्याकारणाने दुहेरी वाहतूक या ठिकाणी धोक्याची बनली आहे. समोरून येणाऱ्या एखाद्या ट्रकला ओव्हरटेक करणे तर सोडाच वाट सोडणे इतपतही काही ठिकाणी जागा नसल्याने अवजड वाहने मातीत रुतून रस्ताच पूर्णतः बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचीच एक अनुभूती आज मंगळवारी सकाळी झाली. त्यामुळे सकाळपासून या रस्त्यावर तासंतास वाहनांच्या रांगा लागल्या शाळकरी व प्रवासी मुलांचे नको ते हाल झाले, ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी याला कोण वाली? असा प्रश्न या भागातील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.