Oplus_16908288

Oplus_16908288


खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी : तालुक्यात तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. स्थानिक पातळीवर पारंपारीक व्यवसायांव्यतिरिक्त रोजगार निर्मिती करणारे व्यवसाय नाहीत. अशा परिस्थितीत तालुक्यातील तरूण देशोधडीला लागला आहे. त्यांना तालुक्यातच रोजगार निर्माण करून देण्याचा ध्यास गर्लगुंजी येथील ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी घेतला आहे. नुकताच त्यांनी यासंदर्भात उद्योह आणि वाणिज्य खात्याचे सहसंचालक सत्यनारायण भट यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

खानापूर तालुका हा दुर्गम असून नवे उद्योग आणण्यात स्थानिक पातळीवर कधीच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे येथील तरूणांना नोकरीसाठी महाराष्ट्र किंवा गोवा गाठावा लागतो. त्याशिवाय बेळगाव येथील उद्यमबाग औद्योगिक वसाहतीवर अवलंबून राहावे लागते. गाव आणि घर सोडून तरूण परप्रांतात जात आहेत. नोकरी आणि रोजगारासाठी होणारे हे स्थलांतर रोखण्यासाठी खानापूर तालुक्यात रोजगारांची निर्मिती करण्याचे ध्येय समोर ठेऊन प्रसाद पाटील यांनी प्रयत्न चालविले आहेत.

उद्योग आणि वाणिज्य खात्याचे बेळगाव जिल्हा सहसंचालक सत्यनारायण भट आणि बेळगाव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लांडगे यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद पाटील यांनी तालुक्यातील उपलब्धता आणि बेरोजगार तरूणांची होणारी परवड त्यांच्यासमोर मांडली. तालुक्यातील सद्य परिस्थिती आणि काय करता येईल, यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील २०० ते २५० एकर जमिन उद्योग आणि वाणिज्य खात्याला उपलब्ध झाल्यास उद्योग निर्मिती करून किमान २५०० तरूणांसाठी रोजगार देता येईल, असे यावेळी ठरले. यासाठी लवकरच जागेची पाहणी करण्यासाठी खानापूर तालुक्याला भेट देण्याचे सहसंचालक सत्यनारायण भट यांनी मान्य केले. यावेळी प्रसाद पाटील यांच्यासमवेत उद्योजक सुरेश धृव पाटील व कल्लापा लोहार उपस्थित होते.

प्रतिक्रिया.. तालुक्यात उद्योग निर्मिती महत्त्वाची….
तालुक्यात वीट, वाळू आणि पारंपारीक शेती व्यवसाय सोडला तर कोणताच उद्योग नाही. त्यामुळे गाव आणि घर सोडून तरूणांना परप्रांतात जावे लागते. याचा परिणाम त्या तरूणांच्या कुटुंबावरच होतो, असे नाही तर समाज आणि संस्कृतीवरही होतो. आपल्या संस्कृतीवर परप्रांतीय संस्कृतीचे अतिक्रमन होते. त्याशिवाय तरूणांची गावाशी, गावाच्या मातीशी असलेली नाळ तुटत आहे. खानापूर तालुक्यात उद्योग निर्मिती झाल्यास नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबून तालुक्यात सुबत्ता येईल. केवळ रस्ते, पाण्याची सोय म्हणजे विकास नाही तर औद्योगिकरण म्हणजे विकास हे आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे. त्यासाठी आमची धडपड चालली आहे.

  • प्रसाद पाटील, सदस्य, ग्राम पंचायत, गर्लगुंजी
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us