
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: बालपणीच्या आठवणी ताज्या करत एकमेकांना आलिंगन देऊन गेल्या 25 वर्षांपूर्वी दूर झालेली अनेक मने एकत्र करून स्नेहमेळ्याचा आनंदोत्सव साजरा करताना एक वेगळाच क्षण अनुभूतीला येतो. अशाच पद्धतीने खानापूर तालुक्यातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वनश्री हायस्कूलच्या 1995 – 96 तुकडी तील माजी विद्यार्थ्यांनी आज सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. खानापूर येथील मधुवन हॉटेल सभागृहात मध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक शाळेचे शिक्षक श्रीयुत एन के पाटील, त्याचबरोबर वनश्री हायस्कूलमध्ये ज्ञानदान केलेले शिक्षक श्रीयुत व्ही बी पाटील, श्रीयुत टी एल सुतार, सौ .एस एस रोटी मॅडम, श्रीयुत रमेश गुरव , श्रीयुत तुकाराम जांबोटकर शिपाई श्रीयुत हनुमंत पाटील श्रीयुत दशरथ नाळकर उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित गुरुजनांचे मंचकावर विराजमान करण्यासाठी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन केले. ईशस्तवन आणि स्वागत गीत गाऊन माजी विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला चालना दिली. मंचकावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले . सेवानिवृत्त शिक्षक श्रीयुत एन के पाटील,सौ एस एस रोटी मॅडम, श्रीयुत तुकाराम जांबोटकर, श्रीयुत रमेश गुरव, श्रीयुत टी एल सुतार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . दुपारी स्नेह भोजनानंतर संगीत खुर्ची,उभा खो-खो ,कबड्डी यासारखे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. त्याला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम. के. पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री व्ही.के पाटील यांनी पार पाडले.