खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मंगळवार दिनांक ३ जून २०२५ रोजी बेळगांवचे जिल्हाधिकारी श्री मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी लोकसभा २०२४ निवडणुकांवेळी शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी असलेल्या परवाना बंदूक सरकारी नियमांनुसार खानापूर शहर पोलिस ठाण्यात जमा केल्या होत्या, परंतु सदर बंदूका अद्याप शेतकऱ्यांना परत करण्यात आलेल्या नाहीत. याची कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली, याचवेळी बेळगांवचे एसपी कळसा-भांडुरा प्रकल्पाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चा संदर्भात बंदोबस्तासाठी हजर होते, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपींना खानापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बंदूका देऊ केल्या नाहीत त्यांची तात्काळ परत कराव्यात अशा सूचना केल्या, त्याप्रमाणे खानापूर पोलिस स्टेशनलाही कळविण्यात आले. त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात पिकविण्यात येणारी गिड्डी लाल मिरची मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली आहे, सदर नुकसानीचा रीतसर पंचनामा करून खानापूर तालुका कृषी अधिकार्यांना संबंधित रिपोर्ट तयार करून देण्याचे आदेश दिले. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील तसेच घरातील लाल गिड्डी मिरचीचे नुकसान संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीनेते श्री गोपाळराव पाटील, श्री प्रकाश चव्हाण, श्री जयराम देसाई, श्री मुरलीधर पाटील, श्री बाळासाहेब शेलार, श्री निरंजन सरदेसाई, श्री राजाराम गावडे, श्री रविंद्र शिंदे, श्री अरुण देसाई, श्री धनंजय देसाई, श्री राजाराम देसाई, श्री विकास कलघटगी, श्री कल्लाप्पा घाडी, श्री अशोक देसाई, श्री मुकुंद पाटील, श्री नितीन देसाई, श्री खंडेराव देसाई, श्री विवेक गिरी, श्री अनंत देसाई, श्री सटवाप्पा देसाई, श्री सुजित देसाई, श्री विनायक देसाई, श्री भीमसेन करंबळकर, श्री रवळू नाळकर, श्री नागेश काळसेकर, श्री दत्तात्रेय हवालदार, श्री लकमाण्णा नाईक, इत्यादी कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.