खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : गुरुवंदना दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी खैरवाड येथील मराठी प्राथमिक शाळेच्या 1998-99 साली 7वी उत्तीर्ण होऊन गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वर्गमित्र मैत्रिणींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. हा स्नेहमेळावा इतर स्नेहमेळाव्यापेक्षा वेगळा ठरला, कारण या माजी विद्यार्थ्यांनी कोणताही मोठा खर्चिक सोहळा आयोजित न करता त्या पैशातून आपल्या शाळेला दोन संगणक भेट दिली.
गेल्या 27 वर्षांपासून एकत्र न आलेले मित्र-मैत्रिणी शाळेच्या आवारात पुन्हा एकत्र आले. यावेळी, त्यांनी आपापल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, आणि एकमेकांशी गप्पा मारल्या. हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पण खूप उत्साहात साजरा झाला.
या स्नेहमेळाव्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, विद्यार्थ्यांनी मोठा गाजावाजा आणि खर्च टाळून, त्या पैशांचा उपयोग शाळेच्या विकासासाठी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शाळेला दोन संगणक भेट म्हणून दिले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल. तसेच शाळासुधरणा कमिटीने त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले होते तो सुद्धा नाकारून सत्कारासाठी होणारा खर्चाच्या रक्कमेची शाळाउपयोगी वस्तू आणण्याची सूचना या माजी विद्यार्थ्यांनी केली. माजी विद्यार्थ्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अमृता जेटगी सहशिक्षिका सौ.कांबळे,श्वेता पाटील,सहशिक्षक रोहित बागे, गणपती बावकर,शाळा सुधारणा अध्यक्ष भुजंग हुंदरे,परशराम ल कग्राळकर, गणेश कांग्राळकर, कामणु इराप्पा पाटील, दत्ताराम खानापूरकर व शाळेचे आजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन आणि सरस्वती फोटो पूजन झाले शाळेतील मुलींच्या स्वागतगीताने या कार्यक्रमाची सुरवात झाली. शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष भुजंग हुंदरे म्हणाले, हा संगणक फक्त एक वस्तू नाही, तर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी आहे. तुम्ही केलेल्या या मदतीबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. यातून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अधिक विकसित करण्याची संधी मिळेल.
”तुमच्या या प्रेमळ आणि अनमोल भेटीमुळे आम्ही भाराऊन गेलो. हा संगणक आमच्या शाळेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या या उदारतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील सहशिक्षक रोहित बागेसरानी सर्व विद्यार्थ्यांना आपण स्वतः जबाबदारी घेऊन संगणकाचे शिक्षण देण्याची व ह्या संगणकाची देखरेख करण्याची या माजी विद्यार्थ्यांना ग्वाही दिली. कामणु इराप्पा पाटील यांनी आपण आजपर्यंत भरपूर माजीविद्यार्थ्यांना स्नेहमेळावा साजरा करताना पहिला असे हे आगळेवेगळा स्नेहमेळावा पाहण्याची ही पहिलीच वेळ आणि कदाचित आपल्या तालुक्यातील पहिला स्नेहमेळावा असेल असे उद्गार काढले “त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने शाळेच्या भविष्यासाठी आणि या पुढे प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. हा स्नेहमेळावा भरण्यासाठी शाळेचे माजीविद्यार्थी परशराम नारायन यळगुकर, उत्तम भैरु कुमानाचे,आणि नारायण गुंडू पाटील यांनी गेल्या साधरण तीन वर्षापासून विशेष प्रयत्न केले.