Oplus_19006464
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते आता खड्डेमय झाले आहेत. अनेक जीवघेण्या खड्ड्यामुळे अपघातांना निमंत्रण झाले आहे. जत- जांबोटी या राज्यमार्गापैकी खानापूर ते जांबोटी दरम्यान अलीकडच्या महिन्याभरात अवजड वाहतूक वाढल्याने या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुचकी चारचाकी वाहनधारकांची मात्र चांगलीच फसगत होताना दिसत आहे. अलीकडे पिरनवाडी – चोरला या राज्यमार्गापैकी कुसमळी या पूलावरील अवजड वाहतूक ठप्प झाल्याने गोव्याला होणारी वाहतूक खानापूर किंवा अनमोड मार्गे वळवण्यात आली आहे .पण बहुतांश प्रवासी खानापूर होऊन जांबोटी मार्गे गोव्याला जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाले आहेत. मोठ-मोठे खड्डे भरल्या पडल्याने पावसामुळे साचलेल्या पाण्यात अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांना निमंत्रण होत आहे.लहान चारचाकी वाहनांना अडकण्याचे प्रकार घडत असून या रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हाती घ्यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
दरम्यान मलप्रभा नदीवरील शंकरपेठ चढावानजीक असलेल्या मलप्रभा नदीच्या पुलावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना या पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेकांच्या भीती निर्माण होत आहे. या पुलाच्या दुतर्फा कठडेही भक्कम नाहीत, मात्र रस्त्यावर पुलावर पाणी साचल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी या पुलावरील पाण्याचा निचरा करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. सदर रस्ता जंगल पट्ट्यातून जातो. त्यामुळे या जंगलपट्ट्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही अपघात किंवा वाहने बंद पडल्यास प्रवाशांची मोठी गोची होत आहे. यासाठी या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा याच रस्त्यावर झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा या भागातील प्रवासी वर्गाने दिला आहे.