
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या वर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे परिणाम, अनियमित विद्युत पुरवठा या विरोधात शासन दरबारी आवाज उठवणे, नेरसा येथून सुरू आलेल्या भांडुरा प्रकल्पाला विरोध करणे, हिंडलगा येथे हुतात्म्या अभिवादनासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होणे. या ठरावाबरोबर नुकताच झालेल्या खानापूर को ऑफ बँकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या समितीनिष्ठ संचालकांचा सन्मान कार्यक्रम आज शुक्रवारी खानापूर येथील शिवस्मारकात आयोजित बैठकीत करण्यात आला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.
प्रारंभी उपस्थित्यांचे स्वागत चिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. त्यानंतर खानापूर को ऑप बँकेवर निवडून आलेल्या बँकेचे चेअरमन अमृत शेलार, संचालक विट्टल गुरव, संचालक व माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार यांचा यावेळी श्रीफळ शाल घालून सन्मान करण्यात आला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्या. खानापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीत खानापूर तालुक्याच्या सर्व भागातील उन्हाळी मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गीड्डी मिरची मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. मात्र पिकलेली मिरची सुकवण्यासाठी शेतकऱ्यांना हंगामच मिळाले नाही. अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने मिरची पिके पूर्णतः कुजून गेले आहेत. शिवाय तालुक्याच्या मध्यवर्ती भागात उन्हाळी मिरची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी कृषी खाते व तहसीलदारांनी या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून देण्यात यावी अशी मागणी एका निवेदना द्वारा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 1 जून हा हुतात्मा दिन या दिनी हिंडलगा येथे सकाळी आठ वाजता हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. शिवाय भांडुरा प्रकल्प हा खानापूर तालुक्याचे नुकसान करणारा ठरणार आहे. याकरिता येत्या 3 जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मोर्चाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून विरोध करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. संरक्षणार्थ असलेल्या बंदुका पोलीस ठाण्यात आहेत. त्या दिल्या जात नाहीत, त्या शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणे, चा ठराव करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकट आणण्यासाठी भेदभाव बाजूला ठेवून एकत्रित लढ्याची गरज आहे संघटना मजबूत राहिली तर मराठी भाषिकांना आगामी काळात चांगले दिवस राहतील.अन्यथा राष्ट्रीय पक्षांच्या गडाला लागून अस्तित्व संपण्याची वेळ येईल याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. यावेळी आदी वक्ते केशव कळळेकर, मारुतीराव परमेकर, राजाराम देसाई, पांडुरंग सावंत गोपाळ देसाई यासह अनेकांची भाषणे झाली. बैठकीला अनेक समिती कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी खजिनदार संजीव पाटील यांनी आभार मानले