उपशीर्षक :बायपास सुरू होणार कधी? चिखलातून जीव मुठीत धरून प्रवास; सात दिवसांत मार्ग खुला न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी :
बेळगाव–पणजी राष्ट्रीय महामार्गावरील माडीगुंजी परिसरातील गुंजी बायपासचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी तांत्रिक अडचणींमुळे हा मार्ग अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. परिणामी संगरगाडी क्रॉस ते गुंजीदरम्यान सर्व वाहतूक जुन्या मार्गावर वळविण्यात आली असून, या रस्त्याचे कामही अर्धवट अवस्थेत असल्याने चिखल, दलदल आणि वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि दैनंदिन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर जागोजागी चिखल साचल्याने पायी चालणेही कठीण झाले असून, महामार्गावर वाहनांची विस्कळीत रांग लागल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वाहने चिखलात अडकण्याचे प्रकारही घडत आहेत.
गुंजी बायपासचे काम पूर्ण असूनही सुरुवातीच्या भागात बॅरिकेड लावून रस्ता बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून अपूर्ण काम पूर्ण करावे व बायपास वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
रस्ता पूर्ण न झाल्यास आंदोलन :
यासंदर्भात भाजपा युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे यांनी इशारा देत सांगितले की, “सात दिवसांच्या आत बायपास मार्ग सुरू करून अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास ग्रामस्थ व युवा कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.”
सध्या या प्रश्नामुळे गुंजी व परिसरातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे – “न्याय मागायचा तरी कोणाकडे?”