
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी चे ग्रामदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराचे चौकट पूजन व माहेरवासिनींच्या स्वागताचा आगळावेगळा समारंभ नागुर्डावाडा येथे मंगळवार दि. 22 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तीनही गावच्या माहेरवासीनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते . सकाळी आठ वाजता मंदिराच्या समोरील चौकटीचे पूजन देणगीदार सौ व श्री नागेश पारवाडकर यांनी केले. मंदिरातील गाभाऱ्याच्या चौकटीचे पूजन सौ व श्री नागेश रवळू वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौकटींचे पूजन श्री बाळकृष्ण हनुमंत पाखरे यांनी केले. या कार्यक्रमांचे अवचित साधून माहेरवासीनींचा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी श्री अभिजीत उदयसिंह सरदेसाई होते.

यावेळी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्री निरंजन उदयसिंह सरदेसाई, नागुर्डा ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. पूजा अण्णाप्पा चाळगोंडे, माजी अध्यक्ष श्री परशराम हनुमंत पाखरे, श्री. लक्ष्मण खांबले, श्री. तानाप्पा चापगावकर, श्री. कृष्णाजी पाटील, श्री. कृष्णा महाजन, सौ. विजयालक्ष्मी कृष्णाजी पाटील, हभप अशोक पाटील, श्री. धाकलू कुंभार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
फोटो पूजन श्री आप्पाजी देसुरकर, श्री. अनंत चापगावकर, श्री. धाकलू बिरजे, सौ. माधुरी पाटील, श्री. प्रवीण सायनाक, पीडीओ नागुर्डा ग्रामपंचायत, श्री. रवळू दत्तू वडगावकर, श्री. मुकुंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व मंदिर जीर्णोद्धार कमीटीचे श्री. कृष्णा गोविंद धुळ्याचे यांनी प्रास्ताविक केले व मंदिराचा जमाखर्च वाचून दाखवला. माहेरवासिनीं मधून दोड्डहोसुरच्या सौ. लीला सोनारवाडकर यांनी आपल्या माहेराविषयी आपली ओढ का असते यावर आपले मत मांडले.
कार्यक्रमाला निमंत्रित वक्त्या म्हणून आलेल्या सौ. कीर्ती विष्णू पाटील, शिक्षिका निडगल, रा. बेळगाव, यांनी स्त्रियांच्या जीवनावर अत्यंत सुरेख असे विचार मांडले. त्यात स्त्री-पुरुष समता, स्त्रीयांची जबाबदारी व स्त्रीयांचे आपसातील वर्तन यावर भर देत अनेक बाबतीत योग्य असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी समस्त महिलावर्गाचा सन्मान करण्यासाठी व त्यांचाही सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी तीन गावच्या माहेरवासीनींना आमंत्रण देण्यात आल्याचे सुतोवाच केले. तसेच कार्यक्रमासाठी आणखी एक वक्त्या सौ. शरयु वसंत कदम, प्राचार्या रावसाहेब वागळे प. पू. कॉलेज खानापूर, यांनी सुद्धा स्त्रियांच्या विषयी बोलताना दाम्पत्य जीवनामध्ये चढउतार येतात पण त्यांच्यातले ऋणानुबंध तसेच राहतात हे पटवून दिले. नंतर त्यांनी आपल्या तालुक्यात होणाऱ्या आत्महत्या या गंभीर विषयावरही मत मांडले.
अध्यक्षीय भाषणात श्री अभिजीत उदयसिंह सरदेसाई यांनी मंदिर उभारणी कशासाठी आहे हे विषद करताना तेथे केवळ पूजन आणि आरत्या करायच्या नसून ते संस्कार केंद्र, बालोपासना केंद्र निर्माण व्हावे असे सांगितले. आपण श्रद्धेने पूजन करावे पण त्यात अंधश्रद्धा डोकावू नये हे पाहिले पाहिजे, गावातील शाळांच्या शैक्षणिक विकासाबरोबर गावातील सर्व दैविक कामे सर्वांच्या आचार विचारातून व सहमतीतून करणे योग्य असून मंदिराच्या उभारण्यात कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेऊया असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागुर्डा येथील महिला बचत गटातील महिलांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायले. सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर कृष्णाजी पाटील यांनी केले. त्यानंतर महाप्रसाद होऊन माहेरवासिनींना आहेर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
