खानापूर: पिराजी कुऱ्हाडे :
खानापूर तालुक्यातील चापगाव पाटील येथील श्री आव्वादेवी आणि गर्लगुंजी माऊली देवस्थान परिसराशी जोडलेला इतिहास आजही गावकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पाटील घराण्याचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री आव्वादेवी अनेक आख्यायिका प्रचलित असून, तिच्या पूजेसोबत ऐतिहासिक परंपराही जपल्या जात आहेत.
चापगाव येथील पत्रकार तथा लेखक पिराजी कुऱ्हाडे यांनी “शोध चंपावती नगरीचा” या पुस्तिकेतून पुरातन काळाचा वेध घेत चापगावच्या इतिहासाची ओळख लिखित केली आहे. त्यामध्ये चापगाव आणि गर्लगुंजी या दोन्ही गावांची कथा मांडली आहे. गर्लगुंजी येथील जागृत व नवसाला देणारी ग्रामदेवता श्री माऊली देवीचा वार्षिक उत्सव दरवर्षी एप्रिल अथवा मे महिन्यात केला जातो. माऊली देवीच्या समोर नवसफेड व स्थळ देवस्थानच्या समोर इंगळ्या नहाण्याची परंपरा व महाप्रसादाचे आयोजन करण्याची परंपरा ही फार जुनी आहे. येथील पाटील घराणे स्थळ देवस्थान समोर धार्मिक विधी, उपास आधी करून बुधवारी सकाळी या ठिकाणी इंगळ्या राहण्याचा कार्यक्रम केला जातो. या इंगळ्या नेमक्या कोणाच्या नावे नाण्याची प्रथा आहे, त्यामागची कारणे काय? याचा मागोवा घेणे क्रमपात्र ठरते. या बाबीचा शोध चंपावती नगरीच्या या पुस्तिकेत दस्तुर खुद्द लेखकानी उल्लेख केला आहे. याला गर्लगुंजी तथा चापगाव येथील जाणकारानी ही दुजोरा दिला आहे..

एका आख्यायिकेनुसार श्री आव्वादेवी ही चापगाव पाटील घराण्यातील मूळ पुरुषाची बहीण होती. तिचा विवाह गर्लगुंजीतील वतनदार युवक राणोजी पाटील यांच्याशी झाला. बलाढ्य सैनिका सोबत विवाहानंतर राणोजी पाटील नववधूला घोड्यावरून घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांची हत्या करण्यात आली. नववधूनेही काही तासांत सती जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुढे तिची पूजा सुरू झाली आणि ती ‘आव्वादेवी’ म्हणून प्रसिद्ध झाली. राणोजी पाटील मारले गेले. मात्र त्यांचे बंधू तुळोजी पाटील यांची नववी पिढी या रीती रिवाज परंपरेचा वसा चालवत आली आहे.
माजी आमदार स्व. वसंतराव पाटील यांनी या पूर्वी दिलेल्या माहितीनुसार, गर्लगुंजीतील राणोजी पाटील आणि तुळोजी पाटील हे घाडसी वतनदार १८३८ च्या काळात होऊन गेले. राणोजी पाटलांचा विवाह चापगाव येथील कन्येशी झाला होता. परतीच्या प्रवासात त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. झालेल्या घनघोर युद्धात राणोजी पाटील मारले गेले. त्यामध्ये घराण्यातील शेकडो सैनिकही मारले गेले. नुकताच बोहल्यावर चढलेली नववधू सती गेली.
आजही या इतिहासाच्या आठवणी जपण्यासाठी माऊली मंदिरासमोर राणोजी पाटलांच्या अंत्यसंस्कार स्थळी शेकडो दगडी पाषाण प्रतीके उभी आहेत. या दगडी तटबंदी त्या काळातील शौर्याची साक्ष देत आहेत.
मंगळवार आणि बुधवार या दिवशी घडलेल्या घटनेच्या स्मरणार्थ देवीची यात्रा याच दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. बुधवारी सकाळी देवीच्या सतीच्या नावाने दोन सुहासिनी गावातून देवळाकडे आरती घेऊन जातात. त्या सुहासिनी मंगळवारी पूर्ण दिवस उपवास करतात. देवीला व थडग्याला आरती ओवाळल्यानंतर इंगळ्यांची पूजा केली जाते. इंगळ्या न्हाऊ घालण्याची परंपराही आजही कायम आहे.
लोककथेनुसार, बोहल्यावर चढलेल्या नववधूने स्वतः सती जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर माहेरी चापगावच्या पाटील घराण्याने गर्लगुंजी पाटलांशी नाते तोडले. नववधूची स्थापना सध्याच्या आव्वादेवी मंदिराच्या ठिकाणी करण्यात आली. कालांतराने ती ‘अव्वा’ म्हणजे आई, आणि पुढे ‘आव्वादेवी’ म्हणून प्रसिद्ध झाली.
चापगावात आव्वादेवी ही पाटील घराण्याची देवता मानली जाते. देवीकडे मागितलेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दर तीन वर्षांनी देवीसमोर मोठा उत्सव भरवण्याची परंपरा असून, पूर्वी हा उत्सव फक्त पाटील घराण्यापुरता मर्यादित होता. आता देवीचा महिमा वाढल्याने यात्रेला मोठे स्वरूप आले आहे.
गर्लगुंजीचे माजी आमदार स्व. वसंतराव पाटील यांनी मुंबई प्रांतातील दस्तऐवजांमध्ये चापगाव आणि गर्लगुंजी गावांचा व पाटील घराण्यांचा परस्पर संबंध नोंदवला असल्याचे सांगितले होते. आजही दोन्ही गावांत रोटी-बेटी व्यवहार होत नसल्याची चर्चा असून, त्यामागे या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ दिला जातो.
श्रद्धा, इतिहास आणि परंपरा यांचा संगम असलेले श्री आव्वादेवी मंदिर आजही चापगाव आणि गर्लगुंजी गावांच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग बनले आहे.
- https://khanapurlive.link/girl-gunji-shri-mauli-yatra-from-wednesday/