खानापूर, ता. २०: पंचहमी योजनेच्या मासिक आढावा बैठकी सोमवारी (ता.२०) रोजी तालुका पंचायत सभागृहात घेण्यात आली. यावेळी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यात आला. विशेषतः गृहज्योती योजना, गृहलक्ष्मी योजना, शिधापत्रिका वितरण आणि वीजपुरवठा सेवेबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.
पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मैत्री प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत हेस्कॉमचे प्रवीण बरगाले यांनी गृहज्योती योजनेचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात योजनेची नोंदणी ९८.४८ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून सध्या ग्रह ज्योतीसाठी पडताळणी सुरू आहे, यासाठी घरोघरी येऊन ऑनलाईन पद्धतीने पडताळणी सुरू आहे त्याला सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी प्रकाश मादार यांनी पश्चिम भागात व नंदगड मध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, तसेच समस्या तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच नंदगड येथे सेक्शन ऑफिसर येथे १५ वर्ष या ठिकाणीच काम करत आहे कामाची बोलण्याची पद्धत बरोबर नाही त्यामुळे त्याची बदली करावी अशी मागणी यावेळी अधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आढाव्यावेळी तालुक्यातील १३८ रास्तभाव दुकानांमधून किती तांदूळ व इतर धान्याचे वितरण केले जाते, याबाबतची अचूक माहिती उप शिरस्तेदार श्रनाप्पा बागेवाडी आणि संतोष यमकनमर्डी यांना देता आली नाही. यामुळे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी व प्रकाश मादार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत, बैठकीला संपूर्ण तयारीने उपस्थित राहण्याची सूचना केली.
गृहलक्ष्मी योजनेच्या आढाव्यात सीडीपीओं विक्रम के. बी आतापर्यंत ५५६ मृत लाभार्थ्यांच्या नावावर लाभाची रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आणले. संबंधित बँकांशी संपर्क साधून ही रक्कम परत मिळविण्यासाठी आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अंगणवाडी केंद्रांबाबतही चर्चा झाली. अनेक प्राथमिक शाळांमध्ये यूकेजी आणि एलकेजी सुरू झाल्यामुळे काही स्वतंत्र अंगणवाडी केंद्रांतील मुलांची संख्या घटली आहे. मात्र, पात्र मुलांना अंगणवाडीमार्फत पोषण आहार व रेशन मिळणे आवश्यक असून, कोणत्याही लाभार्थ्याला रेशन मिळत नसेल तर त्यांनी तात्काळ पंचहमी योजनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
बस व्यवस्थापक संतोष बेनकनकोप यांनी खानापूर डेपोच्या आढाव्यात नवीन बससेवेची माहिती देण्यात आली. माळअंकले-ईदलहोंड परिसरातून उद्या मंगळवार पासून सकाळी साडेनऊ वाजता बससेवा सुरू करण्यात आली असून, या मार्गावरील माळ अंकले, झाड अंकले आणि गणेबैल नागरिकांना त्याचा l लाभ होणार आहे. तसेच बिडी कितुर मार्गावरही बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीला प्रकाश मादार, संजय गावडे, रुद्राप्पा पाटील, प्रियांका गावकर, बाबू हत्तरवाड, इसाक पठाण, गोविंद पाटील, जगदीश पाटील, शांताराम गुरव, विवेक तडकोड, अशपाक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.