खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: तालुक्यातील सर्वेक्षण क्रमांक ३०, ३८, ४० आणि ४५ या जमिनींच्या मालकी व ताब्याबाबतचा वाद पुन्हा चिघळला असून, अतिक्रमणाच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १७) येथील कवळे मठात श्री शिवानंद सरस्वती स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
कवळे मठाच्या मालकीची ही जमीन १९२१ मध्ये ‘द पायोनियर क्ले अँड इंडस्ट्रीज वर्क्स लिमिटेड’ या कंपनीला भाडेतत्त्वावर दिली होती. कालांतराने कंपनीच्या संचालक मंडळात बदल होत गेले
भाडेपट्ट्याचा ४० वर्षांचा कालावधी संपल्यानंतर १९६० साली मठाने जमीन परत मागितली; मात्र ती परत न मिळाल्याने न्यायालयीन लढा सुरू झाला. १९७० मध्ये झालेल्या तडजोडीनुसार भाडेपट्टा ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवला होता. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२१ ला जमीन मठाकडे सुपूर्द केल्याचे सांगण्यात आले.
सध्या हे प्रकरण खानापूर दिवाणी न्यायालय तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात प्रलंबित असून, संबंधित जमिनीवर कोणताही तृतीय पक्ष हक्क निर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. असे असतानाही कंदी रविकुमार यांनी ५० ते ६० जणांसह सर्वेक्षण
क्रमांक ४० व ४५ मध्ये अनधिकृत प्रवेश करून अतिक्रमण केल्याचा आरोप मठाकडून करण्यात आला. त्यांनी स्वतःच्या नावाचे तसेच ‘भीमसेना अध्यक्ष, कर्नाटक राज्य’ असे फलक लावून परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच कंपनीच्या संचालकांनी हुबळी येथील चेतन अशोक भरदवाड यांना
दिलेल्या मुखत्यारपत्राच्या आधारे प्रशासनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रकाश देशपांडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व आभार मानले. शरद केशकामत यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, न्यायालयीन मागनि योग्य ती कारवाई सुरू असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस अॅड. प्रद्युम्न भाटे, अॅड. पद्मा हल्याळी, निलेश बोरकर, रोहित पाटील, गणपती ओशिलकर, विठ्ठल साळुंखे, चंद्रकांत सुरोजी, किशोर नाईक व प्रकाश अगानोजी उपस्थित होते.