Screenshot_20230706_192613

यंदा ‘अधिक मास’ आल्याने श्रावण हा सलग दोन महिन्यांचा राहणार आहे. असा योग अनेक वर्षांतून एकदा येत असतो. यातील ‘अधिक मास श्रावण’ १७ जुलैपासून सुरू होत असून ‘निज श्रावण’ म्हणजे वार्षिक श्रावण १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यामुळे श्रावण पाळणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. मात्र, शास्त्रवचनाप्रमाणे जेव्हा श्रावणात अधिक मास येतो, तेव्हा तो पाळण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे ज्यांना श्रावण पाळायचा आहे त्यांनी गोंधळून न जाता १७ ऑगस्टपासून तो पाळावा, असा सल्ला सोमयाजी सुहोता आपटे यांनी दिला आहे.

हिंदू धर्मात चतुर्मासाला विशेष महत्त्व आहे. या काळात शुद्ध सात्त्विक आहार आणि उपासना, देवपूजा आधींना अधिक महत्त्व दिले जाते. संपूर्ण चतुर्मास पाळता आला नाही, तरी श्रावणात तरी तो पाळावा, असा दंडक आहे. श्रावणात महादेवाच्या उपासनेला विशेष प्राधान्य दिले जाते. चार सोमवारी महादेवाच्या देवळांमध्ये गर्दी असते. पण, यंदा सलग दोन महिने श्रावण आल्याने ८ सोमवार पाळावेत की ४ आणि दोन महिने शाकाहारी रहावे का, दोन महिने श्रावण पाळला नाही तर पाप लागेल का, असे विचार काहीजणांच्या मनात घोळत आहेत. हाच गोंधळ सोमयाजी सुहोता आपटे यांनी दूर केला आहे.

अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते. यंदा हा मास श्रावणात आल्याने श्रावण सलग दोन महिने राहणार आहे. मात्र, दरवर्षी जे श्रावण पाळतात त्यांना ‘पुरुषोत्तम मास’ पाळण्याची आवश्यकता नसते, असे शास्त्र सांगते. त्यामुळे कोणीही मनात शंका ठेवू नये. नित्य श्रावण १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे दरवर्षी श्रावण पाळणाऱ्यांनी १७ जूनपासून तो पाळावा . ज्यांची पुरुषोत्तम मास पाळण्याची इच्छा आहे, ते सलग दोन महिने श्रावण पाळू शकतात, पण तो शास्त्रात दंडक नाही, असेही असेही नमूद करण्यात आले आहे

.

अधिक मास म्हणजे काय?

पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यामध्ये ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास (महिने) मात्र ३५४ दिवसांतच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.

महाराष्ट्र , गुजरात आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील मराठी महिने हे अमावस्येला संपणारे असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही तो ‘अधिक मास’ होय. सौर मास आणि चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी तसेच या ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक महिन्याची योजना करण्यात आली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक ‘क्षय मास’ आणि ‘अधिक मास’ टाकून ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us